माणूसातला देवदूत, सामाजिक ऋणानुबंध सांभाळणारा एक वंदनीय तलाठी.

 माणूसातला देवदूत, सामाजिक ऋणानुबंध सांभाळणारा एक वंदनीय तलाठी.



तलाठी म्हणून नोकरी लागल्यावर मिळणार्‍या पगारातील ५०% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणावर व अभ्यासिकेवर खर्च करणारा "महावेडा" तलाठी.

गजानन जाधव प्रोफेसर, प्राचार्य वा विद्यापीठात कुलगुरु व्हायला पाहिजे होते.अचंबित करणारे कार्य केले असते. स्वतः चे लग्न कमी खर्चात करुन दहा गावात पुस्तकं देत दहा गावात अभ्यासिका सुरु केली. बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तकं भेट दिली. विचारवंतांचे शेकडो विचार व डझनभर लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा गजानन जाधव या वेड्या तलाठ्याची एक कृती श्रेष्ठ वाटते


लाखात लाच घेणारा क्लास वन अधिकारी श्रीमंत की ५०% पगारातून खर्च समाजासाठी देणारा क्लास थ्री तलाठी श्रीमंत???* शासकीय विभागात भ्रष्टाचारी असतात तसे देवदूत व मसीहाही असतातच.


वडील मृत्यू पावल्यानंतर आईने शेती व मजुरी करुन ३ मुली व गजाननला शिक्षण देऊन वाढविले. इलेक्ट्रॉनिक दुकानात नोकरी करत डी एड व बी एड केले. २०१६ ला तलाठी म्हणून नोकरीवर रुजू. पगारातील ५०% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व अभ्यासिकेसाठी खर्च करतात. बुलढाणाचे रहिवासी असणारे गजानन जाधव हे औरंगाबाद येथील वैजापूर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. २८-०२-२०२१ रोजी स्वतःच्या लग्नात दहा गावात स्वखर्चाने ग्रंथासह अभ्यासिका उभारण्याचा संकल्प करुन पूर्ण केला आहे.


२०२१ नंतर आजअखेर दिवठाणा, बोरगाव वसू, सवना, सोनेवाडी आणि शेलुद या ठिकाणी पुस्तके दान करुन अभ्यासिका सुरू केल्या आहेत.

शिक्षणामुळे आयुष्य बदलते पण आर्थिक अडचणींमुळे मुलांना शिक्षण घेता नाही. मुलांना आर्थिक कारणांमुळे शिक्षण घेण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून पगारातून मदत करतात. गरीबीतून आल्यामुळे गरजा कमी आहेत. त्यामूळे ५०% पगारातील रक्कम खर्च करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे गजानन सांगतात.


मुळात डी एड व बी एड झाल्यामुळे शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था आहे. अभ्यासिका व पुस्तके यामुळे मुलांचे आयुष्य बदलते याची जाणीव डी एड व बी एड करताना झाल्यामुळे गजानन यांनी आईशी बोलून समाजासाठी मदत करायला सुरुवात केली.महसूल विभागातील तलाठी हे ग्रासरुट लेवलवरचे महत्त्वाचे पद आहे. महसूल विभागातील लोकांच्या अनेक कथा आपण ऐकतो. लाच घेताना वरिष्ठ अधिकारी पकडले जात असताना तलाठी एक तृतीय श्रेणीतील कर्मचारी मात्र पगारातील ५०% रक्कम समाजासाठी खर्च करतात, ही गोष्ट गजानन यांच्या मनाची श्रीमंती दर्शविते, दानत दाखवून देते.


गजानन जाधव. औरंगाबाद, वैजापूर येथील तलाठी महसूल विभागासाठी नक्कीच Idol आहेत. डिपार्टमेंट कोणतेही असो प्रत्येक विभागात भ्रष्टाचारी जसे असतात तसे मानवतेचे मसीहा व देवदूत असतातच.


लग्न एकदाच होत असते. लग्नात थाटमाट न करता, हौसमौज न करता, डामडौल न‌ करता लग्नात होणारा खर्च समाजासाठी खर्च करणे ही बाबच समाजासाठी दीपस्तंभ ठरते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या