बीड नगर परिषद ची अकार्यक्षमता पोलीस प्रशासनासाठी ठरतेयं डोकेदुखी!वाटसरू नागरिकांची कोण घेणार काळजी? - एस.एम.युसूफ़
बीड प्रतिनिधी :- शहरातील जुने एस.पी. ऑफिस कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आलेले सूचनाफलक पाहून बीड नगर परिषद ची उदासीनता, अनास्था, अकार्यक्षमता जशी नजरेत भरत आहे, तशीच ही बाब पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे ही दिसून येत आहे. मात्र यामुळे वाटसरू नागरिकांची काळजी कोण घेणार? असा प्रश्न मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड नगर परिषदेची उदासीनता, अनास्था आणि अकार्यक्षमतेमुळे बीड शहराच्या विस्तारानुसार आवश्यक असलेल्या मुतारी व संडास जागोजागी निर्माण करणे गरजेचे असताना या महत्त्वाच्या व निकडीच्या बाबीकडे मात्र लक्ष देण्यात येत नाही. याकडे बीड नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष आहे. यामुळे बशीरगंज चौक ते जिल्हा रुग्णालय या रस्त्यावर असलेल्या जुने एस.पी. ऑफिस येथे जिल्हा रुग्णालयात ये-जा करणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक निकडीच्या वेळी जुने एस.पी. ऑफिस च्या आवारात लघु शंका करीत होते. यामुळे या ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बिंदुसरा निवासस्थानी ये-जा करताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुतारीचा उग्रवास येत होता. तसेच गलिच्छता स्पष्ट दिसत होती. यामुळे वैतागून पोलीस अधिकाऱ्यांनी या जागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर मोठे सूचनाफलक लावले तसेच या मुतारीचा जाम वैताग आल्याने फक्त एका सूचना फलकावर समाधान न मानता चक्क मुख्य प्रवेशद्वारा बाहेर एक, मध्ये एक आणि अजून थोड्या अंतरावर एक असे तीन-तीन सूचना फलक लावले. त्यावर येथे लघवी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी तीन-तीन सूचना फलके आणि लांबलचक बॅरिकेट्स लावण्याची वेळ पोलीस प्रशासनावर का आली? तर याचे उत्तर आहे, बीड नगर परिषदेची उदासीनता, अनास्था आणि अकार्यक्षमता. बीड नगर परिषदेने आवश्यक संख्येत बीड शहरात जागोजागी मुतारी आणि संडास बांधले असते तर अशा प्रकारे तीन-तीन सूचनाफलक आणि बॅरिकेट्स लावण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली नसती. निगरगट्ट झालेल्या बीड नगर परिषदेने आता निदान पोलीस प्रशासनाच्या या कारवाईनंतर तरी आपल्या कार्यकर्तव्यात सुधारणा करावी. बीड शहरात आवश्यक तेथे मुतारी व संडासचे निर्माण करावे. जेणेकरून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना निकडीच्या वेळी त्याचा वापर करता येईल. असे मतही मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.


0 टिप्पण्या