राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा संपन्न

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा संपन्न

मुस्लिम तांबटकरी,शिकलकर,कलईगर या जात समूहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्र पाहणी

उस्मानाबाद, जिल्हा प्रतिनिधी :- मुस्लिम तांबटकरी,शिकलकर,कलईगर या जात समूहातील नारिकांची प्रमुख मागणी त्यांना इतर मागासवर्गीय किंवा भटक्या जमाती मध्ये समाविष्ट करून घेण्याची आहे, 
अशा जाती समूहांना न्याय मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे अशा जात समूहांचा सामजिक मागासलेपणा सिध्द कण्यासाठी हा प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आला आहे. त्यांना मागास प्रवर्गात आणुन व प्रमाण पत्र देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची संधी देण्यासाटी आयोगाची औरंगाबाद उपसमितीने जालना, बीड, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वेक्षण केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ.गोविंद  काळे आणि प्रा.डॉ.निलिमा सरप (लखाडे) यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील इंदापूर आणि वाशी, कळंब येथील जूना पोलीस स्टेशन याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या मुस्लिम तांबटकरी,शिकलकर,कलईगर या जात समुहाच्या लोकांशी सह्रदयतेने संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत  क्षेत्र पाहणी केल्यानंतर दिली.
    यावेळी  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाटे, लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक संचालक दिलीप राठोड ,
 जिल्हा जात  प्रमाणपत्र पडताळणी समिती उस्मानाबादचे उपायुक्त बलभीम शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक बाबसाहेब अरवत तसेच समाज कल्याण निरीक्षक युवराज भोसले , युवराज चव्हाण, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी,मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. 
       डॉ.काळे आणि डॉ. सरप यांनी मुस्लिम तांबटकरी,शिकलकर,कलईगर या जात समूहातील व्यक्तींना त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांची सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक परिस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांची जीवनशैली, राहणीमान, घराची स्थिती, रोजगार, व्यवसाय आणि संस्कृतीची निरीक्षणे नोंदविली. या जाती समूहाची लोक भटकंती करून आपला व्यवसाय करत असतात,त्यांचा मुख्य काम पितळ आणि तांब्याच्या भांड्यांना कलई करणे, वस्तूंना धार लावण्याचे असून सध्या या व्यवसाय आता फारसा चालत नाही तसेच कुठल्याही प्रकारच्या प्रवर्गात त्यांचा समावेश नसल्याने त्यांची आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिशय खालवलेली आहे. या जात समूहातील नारिकांची प्रमुख मागणी त्यांना इतर मागासवर्गीय किंवा भटक्या जमाती मध्ये समाविष्ट करून घेण्याची असल्याचे सदस्यांनी सांगितले.
      यावेळी त्यांनी या जात समूहाच्या प्रतिनिधी, व्यक्तींशी चर्चा करत त्यांना स्थलांतरीत झाले असल्याचे सबळ पुरावे, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे जोडून राज्य मागासवर्ग आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या 'कुटुंबासाठी मुलाखत अनुसूची' या विहित नमुन्यात ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे सादर करावेत, अशी सूचना करुन  संबंधित गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी सदरील अर्जाचे प्रामाणिकरण करून घेतलेले अर्ज तहसीलदार यांच्याकडे जमा करावेत. संबंधित तहसीलदारांनी सदरील अर्ज महाराष्ट्र राज्य  मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात 15 दिवसांच्या आत जमा करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. जेवढी माहिती अचूक व पुराव्यानिशी दिली जाईल ती माहिती आयोगाकडून अहवालाद्वारे अधिवेशनात सादर करण्यात येऊन पात्र संबंधितांना या प्रवर्गाचा लाभ मिळवून दिला जाईल,  अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 
         जिल्ह्यातील दौऱ्यात सदस्यांनी इंदापूर या गावातील शेख मोहियोद्दीन शिकलगर, शेख फैजोद्दीन चांदसाहब,मीना अनवर शिकलगर,दादा मियां शिकलगर,सुल्तान शिकलगर,समीना  यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. वाशी गावातील गफ्फार रज्जाक लोहार, हनीफ लोहार, शेख युसुफ लोहार, बाबमिल्या लोहार यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात संबंधित समुदायाचे व्यक्ती, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या