जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या करा - एस.एम.युसूफ़

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या करा - एस.एम.युसूफ़

वर्षानुवर्षापासून शिक्षक मंडळी ठाण मांडून; स्थानिक शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम, जून महिन्यात आंदोलन !

बीड जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षक एकाच शाळेत अजून किती वर्षे ठाण मांडून राहतील ? असा प्रश्न उपस्थित करून पाच पेक्षा जास्त वर्षे एकाच शाळेत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात. अन्यथा जून महिन्याच्या सुरुवातीलाच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदनातून दिला आहे.
             याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड जिल्हा परिषद मार्फत जिल्हाभरात मराठी माध्यमांच्या एकूण ५६ व उर्दू माध्यमांच्या एकूण १२ शाळा चालविल्या जात आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये दोन्ही माध्यमाचे मिळून जवळपास २५० शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांची नियुक्ती झाल्यापासून बरेचसे शिक्षक एकाच शाळेत एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. यापैकी काहींची सेवा तर एकाच शाळेवर पूर्ण होईल असेही दिसून येत आहे. विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या जून २०१८ पासून सुरू झाल्यानंतर प्रत्येक शिक्षकाची शाळा ही ३ किंवा ५ वर्षानंतर बदलणार आहे. यावर्षीही जवळपास दीड हजारापेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत. तर माध्यमिक शिक्षकांची संख्या फक्त अडीचशे च्या जवळपास असूनही माध्यमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात येत नाहीत. यामुळे माध्यमिक शिक्षक जवळपास १५ ते २० वर्षांपासून एकाच शाळेत एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार सन २०१४ च्या शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. मात्र विषयाची आड घेऊन शिक्षण विभाग माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या करत नाही. यामुळे ग्रामीण विभागात काम करणाऱ्या शिक्षकांना शहरी भागात काम करण्याची संधीच मिळत नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास चकलांबा, उमापूर, धोंडराई, फुलसांगवी, ब्रम्हनाथ येळंब, पोत्रा, ताडसोन्ना, धर्मापुरी, नाहोली इत्यादी शाळेवरील शिक्षकांना शहरी भागात कार्य करण्याची संधीच देण्यात येत नाही. वर उल्लेख केलेल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांना गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद मुला-मुलींच्या शाळेत, बीड शहरातील जिल्हा परिषद मुला-मुलींच्या शाळेत तर बीड शहरापासून जवळ असलेल्या पाली या ठिकाणच्या शाळेत कर्तव्य बजावण्याची संधीच दिली जात नाही. वर उल्लेख केलेल्या बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांच्या बदल्यांचे सत्र हाती घेण्यात यावे. यामध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे एका शाळेत व एकाच ठिकाणी असलेल्या माध्यमिक शिक्षकांना ग्रामीण भागातून शहरी भागात आणि शहरी भागातून ग्रामीण भागात बदल्या करून पाठविण्यात यावे. जेणेकरून ग्रामीण भागातील शिक्षकांना शहरी भागातील विद्यार्थ्यांना व शहरी भागातील शिक्षकांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची संधी मिळेल तसेच या बदल्यासत्रांचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही सकारात्मक परिणाम होईल. नाहीतर वर्षानुवर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले शिक्षक हे डबक्यातल्या बेडकासारखे झाले नसल्यास नवल. यामुळेच की काय  असे शिक्षक आपल्या कर्तव्याऐवजी बऱ्याचदा राजकीय पुढारपण करत असल्याचेही दिसून येते. असे शिक्षक जे शहरी भागात कार्यरत आहेत व ज्येष्ठतेनुसार त्यांना शासन नियमाप्रमाणे पदोन्नती मिळत असूनही ती न घेता आहे त्याच शाळेत त्याच पदावर चिटकून राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. जसे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परळी व बीड शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुला-मुलींची या दोन शाळेतील माध्यमिक शिक्षकांच्या सेवाकाळावर व ते जेव्हापासून या शाळांमध्ये रूजू झाले आहेत तेव्हापासून आतापर्यंत चा त्यांचा सेवा आलेख पाहिला तर ही बाब सहज समोर येते. असे असतानाही शिक्षण विभाग व बीड जिल्हा परिषद प्रशासन का म्हणून वर्षांनुवर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अशा शिक्षकांची इतर शाळांमध्ये बदली करण्यास धजावत नाही ? की असे शिक्षक, शिक्षण विभाग किंवा बीड जिल्हा परिषद किंवा शासनाचे जावई आहेत का ? असे प्रश्नही यामुळे निर्माण होत आहेत. तरी अशा सर्व ज्येष्ठ व एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे बदली सत्र येत्या शैक्षणिक वर्ष मे २०२३ मध्ये करण्यात यावे. आणि ग्रामीण भागात खितपत पडलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी करून जर माध्यमिक शिक्षकांचे बदली सत्र सुरू करण्यात आले नाही तर येत्या १ जून २०२३ पासून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र  एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदनातून दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या